‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’   

टिमवित अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात

पुणे : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केवळ एक यशस्वी प्रशासक म्हणून नव्हे तर सामाजिक, न्याय, सुधारणा आणि महिला सक्षमीकरणाच्या खर्‍या अर्थाने प्रेरणादायी प्रतीक म्हणून कार्य केले आहे, असे प्रतिपादन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या नीती व सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाच्या अधिष्ठता डॉ. माधवी रेणावीकर यांनी केले.
 
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभाग, नेहरू सामाजिक शास्त्रे विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती उत्सव व अभ्यास शिबिरासह विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. रेणावीकर बोलत होत्या. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रसिद्ध वक्ते सुधीर थोरात, समाजकार्य विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश यादव, नेहरू सामाजिक शास्त्रचे विभागप्रमुख डॉ. माणिक सोनवणे, रासेयो विभागाचे समन्वयक ओंकार केने, समाजकार्य विभागातील प्रा. डॉ. गीता जोशी, डॉ. भाग्यश्री रुईकर, सहा. प्रा. स्मिता वरघडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी नीता कदम, तसेच विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
हुंडाबंदी, विधवांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार, महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करणे, महिला  आणि बालकांच्या संरक्षणासाठी कायदे या सर्व अहिल्याबाईंच्या क्रांतिकारी कार्याची महत्त्वपूर्ण माहिती उपस्थितांसमोर डॉ. माधवी रेणावीकर यांनी मांडली. त्या पुढे म्हणाल्या, अहिल्याबाईंनी समाजातील सर्व स्तरांपर्यंत कल्याण पोहोचवले. त्यांनी आपल्या पदरमोडीतून संपूर्ण भारतभर मंदिरांचे जीर्णीद्धार, जलस्त्रोतांचे जतन, गरजुंसाठी सुविधा निर्माण केली. अशा महान स्त्रीचे कार्य समाजकार्याच्या अभ्यासक्रमात स्थान मिळायला हवे.
 
सुधीर थोरात म्हणाले, अहिल्याबाई होळकर या केवळ धर्मप्रेमी नव्हे तर दूरदृष्टी असलेल्या समाजसुधाकर आणि न्यायनिष्ठ प्रशासनकर्त्या होत्या. त्यांनी भिल्ल समाजासाठी केलेल्या आंतरजातीय विवाहाच्या निर्णयाला सामाजिक समरसतेचे उदाहरण ठरवले.
 
कार्यक्रमाचे प्रस्ताविक समाजकार्य विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश यादव यांनी प्रस्ताविक केले. ते म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि सुधारणा यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अहिल्याबाईंनी केलेल्या कार्याचा समावेश समाजकार्याच्या अभ्यासक्रमात व्हावा यासाठी विचार करणे काळाची गरज आहे.
 
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी टिमविच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक, कुलपती डॉ. दीपक टिळक, कुलसचिव, सचिव यांचे तसेच प्रशासन विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का सोमवंशी यांनी केले.  गौरव भट यांनी आभार मानले.
 

Related Articles